धनकवडी बसस्टॉपचा श्वास गुदमरतोय...!

धनकवडी बसस्टॉपचा श्वास गुदमरतोय...!

अतिक्रमणे, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी


नमस्कार पुणे, ऑनलाईन  ः धनकवडीत प्रवेश करताच आपले स्वागत होते ते दुर्गंधीने... बसस्टॉपजवळच्या अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे येथून जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. अनेकदा या स्वच्छतागृहातून मैलापाणीही रस्त्यावर येते. पुढे पीएमपी बससह सहा आणि तीन आसनी रिक्षा, आडवी-तिडवी उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे शेवटचा बसस्टॉप नेहमीच भरलेला असतो. त्यातून कशीबशी वाट काढत आपण पुढे निघालो की रस्त्यावर दुतर्फा बसलेले भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्या गर्दीतून वाट काढण्याची कसरत करावी लागते. त्यातही दोन्ही बाजूंनी चारचाकी गाड्या आल्या तर किमान 20-25 मिनिटे वाहतूक कोंडी सुटत नाही. रोज सकाळी शाळा, क्लास, ऑफिस आणि कामावर निघालेल्या धनकवडीकरांसाठी हा अनुभव रोजचाच..




येथे रस्त्यावरच भरते भाजी मंडई !

रस्त्यावर भरणारी भाजी मंडई ही येथील वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे. पूर्वी रस्त्यावर भाजी विकणार्‍यांची संख्या मर्यादित होती. मात्र आता पोस्ट ऑफिसपासून ते धनकवडी बस स्टॉप मार्गे सावरकर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे बस स्टॉपपासून सावरकर चौकाकडे जाताना मूळ अरुंद असलेला रस्ता वाहतुकीसाठी आणखी अरुंद होतो आणि वाहतूक कोंडी होते. काही वर्षांपूर्वी भाजी मंडई स्मशानभूमीजवळ हलविण्याचा प्रयोग झाला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला. आता परिसरात वाढलेल्या वाहनांची संख्या लक्षात घेता भाजी मंडईचा प्रश्न तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.



जाळ्या करतात स्पीडब्रेकरचे काम

धनकवडीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पावसाळी लाईनवर असलेल्या जाळ्या अगदी अलीकडेच बसवल्या आहेत. तरीही जाळ्याच्या चारही बाजूने रस्ता उखडला आहे. काही ठिकाणी जाळ्या आणि रस्ता यांची उंची एकसारखी झालेली नाही. त्यामुळे वाहने येथून खडखड करत जात असतात. अशा सुमारे 5-6 जाळ्या या रस्त्यावर आहेत. परिणामी, वारंवार खडखड करत वाहन चालविण्यापेक्षा जाळ्यांवरून जाण्याचे टाळून वाहनचालक रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूनेच वाहने चालवतात. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. दोन पीएमपी गाड्या आल्यास त्या पुढे निघत नाहीत तोपर्यंत संपूर्ण वाहतूक ठप्प होते.





... हा उपाय की समस्या?


शेवटच्या बसस्टॉपजवळ कोपर्‍यात महावितरणचा डीपी आहे. तेथे कचरा टाकला जात असल्याने संरक्षक भिंत बांधली आहे. परंतु यामध्ये मेख अशी की आवश्यक तेवढीच संरक्षक भिंत बांधण्याऐवजी आतमध्ये मोठ्या प्रमाणात जागा करण्यात आली आहे. तेथे बसण्यासाठी सिमेंटचे ओटे तयार केले आहेत. परंतु ही संरक्षक भिंत वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहे. दोन वाहने एकावेळेस येथून एकमेकांना क्रॉस करून जात असताना मोठी कसरत करावी लागते. बर्‍याचदा दोन्ही वाहने जात नसल्यामुळे चालकांमध्ये वाद आणि कोंडी असे प्रकार अनेकदा येथे घडतात. आतमध्ये बसण्यासाठी सिमेंटचे ओटे तयार केले असले तरी जवळच्या भाजीविक्रेत्यांकडून याचा वापर कचरा टाकण्यासाठी अथवा भाजीचे क्रेट ठेवण्यासाठी केला जात आहे. कचरा टाकल्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे. त्यामुळे येथील संरक्षक भिंत लहान करून दोन्ही बाजूने रस्त्यासाठी जागा मोकळी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बस वळविण्यास अपुरी जागा

पूर्वी या भागात बसची संख्या मर्यादित होती. मात्र आता पीएमपीच्या बसच्या फेर्‍या वाढल्या आहेत. तसेच शाळा, खासगी कंपन्यांच्या बसही येथून माघारी वळविल्या जातात. मात्र, सहा आसनी तसेच तीन आसनी रिक्षांचा थांबा, हातगाडीवाले, भाजीवाले यामुळे बस वळविण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. पीएमपीची बस वळविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. तसेच वाहतूकही विस्कळीत होते.
धनकवडी बसस्टॉपचा श्वास गुदमरतोय...! धनकवडी बसस्टॉपचा श्वास गुदमरतोय...! Reviewed by Unknown on 7:09 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads