MNS che shahradhyaksh "AJAY SHINDE" yanchi khas mulakhat


मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांची  खास मुलाखत 


आव्हान ‘इंजिन’ रुळावर आणण्याचे !


रांगण्याच्या वयात पळण्याचे नशीब लाभलेला आणि लोकशाहीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे रांगण्याची वेळ आलेला पक्ष असे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे वर्णन केल्यास चुकीचे ठरणार नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेने नागरिकांच्या मनावर गारूड केले होते. त्यामुळे मनसेच्या तब्बल 28 नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात दिमाखात प्रवेश केला. परंतु मोदी लाट आणि नगरसेवकांनी नागरिकांचा गमावलेला विश्वास यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे पानीपत झाले. केवळ दोघे जण विजयी झाल्याने महापालिकेत कसेबसे पक्षाचे अस्तित्त्व राहिले. अशा खडतर परिस्थितीत मनसेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी एक साधा, हाडाचा, सर्वसामान्यांसाठी लढणारा, युवा कार्यकर्ता अजय शिंदे यांच्या खांद्यावर आली आहे. सुरवातीच्या काळात पक्षाला मिळालेले वैभव पुन्हा मिळवून देणे आणि जनमानसात पक्षाबाबत विश्वास निर्माण करण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अजय शिंदे यांच्याशी ‘नमस्कार पुणे’ने केलेली बातचीत...

- सोमनाथ गर्जे






















शहराध्यक्ष पद देऊन पक्षाने तुमच्यावरच का विश्वास टाकला?

कोणताही राजकीय वारसा आणि आर्थिक ताकद नसतानाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. हा माझ्या एकट्यावरील नाही तर पक्षाचे युवा आणि नवे-जुने कार्यकर्ते या सर्वांवर टाकलेला विश्वास आहे. मी आज जो काही आहे, तो केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांमुळेच. त्यांनी साथ दिल्यामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास करू शकलो. त्यामुळे आज पक्षाचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिले जात असले तरी त्यामागे असंख्य कार्यकर्त्यांची साथ आहे. अनेक आंदोलनांमध्ये या कार्यकर्त्यांनी साथ दिल्यामुळेच मला या पदापर्यंत पोचता आले. कदाचित हे युवा कार्यकर्ते आणि वरिष्ठांचा संच माझ्यामागे आहे, म्हणूनच पक्षाने माझ्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असावा.

पक्षातील नाराजी कशी दूर करणार?
रुसवे-फुगवे हे सगळीकडेच असतात. राजकीय क्षेत्रात ही टाळता न येणारी गोष्ट आहे. परंतु कुणाची नाराजी असेल तर ती दूर करून आणि सर्वांना सोबत घेऊन काम केल्यास नाराजीचा प्रश्न येतोच कुठे? सर्वांच्या साथीने संघटनेची बांधणी केली जाईल. समाजातील शेवटच्या स्तरातील शेवटच्या एखाद्या घटकाचा जरी प्रश्न संघटनेच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सुटतो का, त्यांना आपण न्याय देऊ शकतो का, यावर पक्षाच्या यशाचे मूल्यमापन व्हावे, असे वाटते.

ही जबाबदारी कशी पेलणार?
आज पक्षाला उभारी देण्याची सर्वांत मोठी गरज आहे. हे काम कुणीही एकटा करू शकत नाही. त्यासाठी सर्वांचीच साथ आवश्यक आहे. त्यामुळे एकमेकांच्या हाताला धरुनच चालावे लागणार आहे. तरच हे शिवधनुष्य पेलवता येईल. त्यासाठी पक्षातील सर्वांचीच तयारी आहे.

पक्षाच्या आज झालेल्या दुर्दशेचे विश्लेषण कसे कराल?
सुरवातीच्या काळात पक्षाकडून लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळेच लोकांनी पक्षाला भरभरून प्रेम दिले. परिणामी, महापालिकेत दुसर्‍या क्रमांकाचे संख्याबळ मनसेला मिळाले. परंतु काही जणांच्या स्वार्थी वृत्तीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. अशाच लोकांनी आता अन्य पक्षांची वाट धरली आहे. पक्षाच्या नगरसेवकांनी केलेली चांगली कामे लोकांपुढे आणण्यात आम्ही कमी पडलो. तसेच लोकांनी आम्हाला नाकारले नाही, तर भाजपाने दाखविलेल्या स्वप्नांना जनता भुलली, हेही तेवढेच खरे आहे.

पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी कार्यकर्त्यांना कोणता कार्यक्रम देणार?  
‘जिथे मी असेल तिथे आम्ही असू’ या सूत्राप्रमाणे यापुढ काम केले जाईल. त्यामुळे येत्या काही काळात पक्षाचे संपूर्ण स्वरुप बदललेले पहायला मिळेल. आतापर्यंत पक्षाच्या अजेंड्यावर तळाचा घटक नव्हता. त्यालाही प्राधान्याने पक्षाच्या कार्यकक्षेत आणले जाईल. वास्तविक 2012 मध्येच याकडे लक्ष देण्याची गरज होती. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. आजवर दहशत म्हणून संघटनेकडे पाहिले गेले. मात्र, दहशत फार दिवस टिकत नाही. आता दहशतीचे रुपांतर ‘दरारा’मध्ये करून प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील. परंतु असे करताना माणुसकीला धक्का लागू न देता आक्रमकता हा मनसेचा मूळ गाभा कुठेही हरवणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. यंत्रणेला विश्वासात घेतले तर त्यांच्याकडून लोकांची कामे होतात. याकडे विशेषत्त्वाने लक्ष दिले जाईल.

शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची संधी का सोडली?
शेतकर्‍यांचा प्रश्न नक्कीच मोठा आणि ज्वलंत आहे. परंतु शहरात लाखो मुले शिक्षणासाठी, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेली आहेत. त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. अगदी राहण्यापासून जेवण आणि शैक्षणिक शुल्क भरण्यापर्यंतच्या अनेक समस्या त्यांना येत आहेत. ही सर्व ग्रामीण भागातून आलेली शेतकर्‍यांचीच मुले आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. वीज, आरोग्य सुविधा यावरही भविष्यात लक्ष केंद्रित केले जाईल.

सध्या शहरात सर्वत्र बोलबाला असलेल्या स्मार्ट सिटी योजनेबाबत आपले मत?
एकंदरच देशात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर रोजगार कमी झाले आहेत. कामगार रस्त्यावर येत आहेत. परंतु सरकार काहीही करत नाही. कामगार, शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, गरीब हे सर्वच घटक पिचले आहेत. पैसेवाला आणि गरीब दोघांनाही कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. गेल्या तीन वर्षात ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून शहरात एकही प्रकल्प मार्गी लागलेला नाही की एक रूपयाही खर्च झालेला नाही. त्यामुळे फसवणूक करणारी परंतु लोकांच्या माथी मारलेली योजना म्हणजे स्मार्ट सिटी योजना, असे या योजनेचे विश्लेषण केले तर चुकीचे ठरणार नाही.
MNS che shahradhyaksh "AJAY SHINDE" yanchi khas mulakhat MNS che shahradhyaksh "AJAY SHINDE" yanchi khas mulakhat Reviewed by Unknown on 3:15 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads