वडिलांचा फोटोग्राफी आणि स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय, तर आईचा शिक्षकी पेशा, अशा वातावरणात राजकारणात जाऊ इच्छिणारा एक तरूण तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये काम सुरू करतो. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी स्वत:ची शिक्षणसंस्था सुरू करतो. अल्पावधीत या छोट्या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर करून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे खर्या अर्थाने सोने करतो... ‘फोटोग्राफी ते शिक्षणसंस्थाचालक’ हा थक्क करणारा प्रवास आहे शिक्षण क्षेत्रात ‘अभिनव’ प्रयोग राबविणार्या ‘अभिनव एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष राजीव जगताप सरांचा...!
- ऊर्मिला हिरवे
सन 1989-90 मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. यावेळी अध्यक्ष-प्रतिनिधी म्हणून राजीव जगताप यांना काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी फार्मसी कॉलेज (डिप्लोमा) आणि त्यानंतर फार्मसी कॉलेज डिग्रीसाठी मान्यता मिळवण्यापासून कॉलेज उभे करण्यापर्यंत सर्व जबाबदारी हाताळली. यानंतर इतरही अनेक शिक्षणसंस्थाचे कामकाज त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले. यादरम्यानच राजकारणात उडी मारण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. मात्र, शैक्षणिक क्षेत्रात 12 वर्षे काम केल्याने स्वत:ची शिक्षणसंस्था सुरू करण्याचा सल्ला प्रा. रामकृष्ण मोरे यांनी त्यांना दिला. त्यावर विचार करून शिक्षणाची दारे सर्वसामान्यांना खुली व्हावीत, या उद्देशाने जगताप सरांनी ज्येष्ठ बंधूसमान असलेल्या मोरे सरांचा हा सल्ला स्वीकारला आणि ते जोमाने कामाला लागले. शिक्षणसंस्थेसाठी जागा मिळवण्यापासून अनेक अडचणींचा सामना करत 2003 मध्ये अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे रोपटे लावले. यानंतर जगताप सरांनी मागे वळून पाहिलेच नाही. 2005 मध्ये त्यांनी नर्हे येथे फार्मसी (डिप्लोमा) कॉलेज सुरू केले. सन 2007 हा ‘अभिनव’च्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा ठरला. सरांनी नर्हे येथे फार्मसी (डिग्री), एमबीए आणि वडवाडी येथे पॉलिटेक्निक अशी तीन महाविद्यालये या एकाच वर्षात सुरू केली. 2009 मध्ये वडवाडी येथे इंजिनिअरिंग कॉलेज आणि 2010 मध्ये इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केले. अशा प्रकारे अवघ्या 6 वर्षात पाच कॅम्पसमधून 19 इन्स्टिट्यूटपर्यंत ‘अभिनव’चा वटवृक्ष विस्तारत गेला. आज जगताप सरांसह त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीताताई, बंधू संजय जगताप आणि मुलगा निर्मोही हे संस्थेच्या पालखीचे भोई आहेत. केवळ शिक्षण आणि शिक्षण हाच लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गात फुलांसोबत काटेही वाट्याला आले तरी लोकांचे जीवन समृद्ध केल्याचे समाधान असल्याचे जगताप सरांनी नमूद केले.
वास्तविक, अभिनव हे जगताप सरांच्या वडिलांनी सुरू केलेल्या फोटो स्टुडिओचे नाव. हेच नाव शिक्षणसंस्थेसाठी वापरताना त्यांनी आधी वडिलांची परवानगी घेतली. आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात ‘अभिनव’ हा शिक्षणक्षेत्रातील ‘ब्रॅण्ड’ बनला आहे.
सर्व काही विद्यार्थ्यांसाठी...
शैक्षणिक क्षेत्रातील वेगवेगळे प्रयोग हे या संस्थेचे वैशिष्ट्य मानले जाते. गेल्या वर्षी ‘अभिनव’ने सातवी ते नववीतील विद्यार्थ्यांची ‘इस्त्रो’ला अभ्यास सहल नेली. त्याआधी सिंगापूरमधील ‘सायन्स सेंटर’लाही विद्यार्थ्यांनी भेट दिली होती. विशेष म्हणजे या सहलींचा निम्मा खर्च ‘अभिनव’ने केला.
‘अभिनव’च्या वडवाडी (ता. भोर) कॅम्पसमध्ये मुलींसाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. यामागची प्रेरणा जगताप सरांनी सांगितली. मुलीला जास्त मार्क्स असतानाही एका पालकाने कमी मार्क्स असलेल्या मुलाला इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. याबाबत विचारले असता मुलीला शिकवून काय करायचे, तिच्या इंजिनिअरिंगसाठी आमच्याकडे पैसेही नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले. एवढेच नाही तर ‘तुम्ही देणार का फुकट शिक्षण’ असा प्रश्नही त्यांनी विचारला. या प्रश्नाने जगताप सर विचारमुख झाले. मात्र अवघ्या काही सेकंदातच ‘देतो फुकट शिक्षण’ असे उत्तर सरांंनी त्या पालकांना दिले. मुलीसाठी होस्टेलचीही मोफत व्यवस्था केली.
मुलगी शिकली की तिचे लग्न सुशिक्षित कुटुंबात होते. पुढे ती स्वत:च्या मुलांनाही चांगले शिक्षण देते. एकंदरच संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान उंचावते. त्यामुळे मुलींना शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, या विचारातून सरांनी वडवाडी येथील कॅम्पसमध्ये मुलींसाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि होस्टेलही मोफत उपलब्ध करून दिले. आज तब्बल चार हजारांहून अधिक मुली संस्थेत इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयामागचा जगताप सरांचा हा विचार त्यांचे वेगळेपण अधोरेखित करतो.
सीईटी कशासाठी?
सीईटीमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर अकारण ताण वाढत असल्याचे जगताप सरांचे म्हणणे आहे. या परिक्षेची काठिण्यपातळी पाहता इंजिनिअर होण्याआधीच त्यांची गुणवत्ता कशी तपासता, सीईटीच्या गुणांनुसारच प्रवेश द्यायचा तर बारावीची परीक्षा कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. मुलांनी बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा आणि सीईटीचाही. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझेही वाढले आहे. तसेच यामुळे क्लासला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. ग्रामीण भागात सीईटीसाठी क्लासेस नसल्याने तिथल्या विद्यार्थ्यांवर सीईटी लादणे हे अन्यायकारक आहे. तसेच विद्यार्थीक्षमता कमी आणि इच्छुक विद्यार्थी जास्त अशी स्थिती असल्यास प्रवेश देण्यासाठी सीईटी घेणे व्यवहार्य आहे. मात्र आता बहुतांश अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे सीईटी घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत अडसर निर्माण करण्यासारखाच हा प्रकार आहे.
‘नादारी’ आणि मोफत शिक्षण
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 1200 रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून केले. त्यासाठी दिल्या जाणार्या शिष्यवृत्तीला ‘नादारी’ असे म्हटले जायचे. आजही आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षण देणे शक्य आहे, परंतु त्याला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ असले पाहिजे, असे ठाम मत जगताप सरांनी व्यक्त केले.
क्लासेसना नियम का नाही?
शिक्षणसंस्था सुरू करण्यासाठी सरकारने अनेक कठोर नियम केले आहेत. मात्र, खासगी क्लासवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. हा विरोधाभास नाही का? क्लासमधील प्रवेशमर्यादा, पायाभूत सुविधा, क्लासची फी अशा कोणत्याच बाबींवर सरकार लक्ष देत नसल्याने खासगी क्लास चालवणार्यांकडून पालकांची पिळवणूक होत आहे, हे चिंताजनक आहे.
35 टक्के.. काठावर पास?
शिक्षण क्षेत्रात 35 टक्के ही उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणसंख्या आहे. मग विविध अभ्यासक्रमांसाठी 50 टक्के, 60 टक्के ही मर्यादा का? 35 ते 50-60 टक्के यामधील गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे हे विद्यार्थी निराश होऊन शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला जातात. एकीकडे महाविद्यालयातील जागा रिक्त राहतात आणि दुसरीकडे शिकण्याची इच्छा असतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाही, हा विरोधाभास दूर होणे आवश्यक आहे. अनेकदा काही कारणाने विद्यार्थ्याला एखाद्या वर्षात कमी गुण मिळतात. मात्र, पुढील वर्षी तो नेटाने अभ्यास करून चांगले गुण मिळवतो. मात्र, आपण त्याला शिक्षणाची संधीच दिली नाही तर त्याच्यात सुधारणा कशी होणार? विद्यार्थीकेंद्रित निर्णय होत नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित रहात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शैक्षणिक क्षेत्रातील ‘अभिनव’ वाटचाल
Reviewed by Unknown
on
12:00 AM
Rating:

No comments: