भाजपाच्या ‘पारदर्शक’ कारभाराच्या ठिकर्या!
सोमनाथ गर्जे
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : शहरात भाजप नगरसेवकांना मिळालेल्या एका निनावी पत्राने भाजपाच्या घराच्या ‘पारदर्शक’ काचेच्या ठिकर्या उडाल्या आहे. चक्काचूर झालेल्या काचेच्या अणकुचीदार तुकड्यांनी शहरातील संपूर्ण भाजपाच रक्तबंबाळ झाला आहे. या ‘लेटरबॉम्ब’मुळे झालेले डॅमेज कन्ट्रोल करताना पक्षाला मोठी ताकद खर्ची खालावी लागणार हे निश्चित!
शहर भाजपामध्ये पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांचे सरळ दोन गट पडल्याचे मानले जाते. यातील काकडे गटाला डावलले जात असल्याची त्यांच्या समर्थकांची भावना आहे. यातूनच नुकतेच 1800 कोटी रुपयांचे चोवीस तास पाणी पुरवठ्याचे टेंडर रद्द झाल्यानंतर दोन्ही गटातील वाद चव्हाट्यावर आला. त्यातच भाजपाचे पदाधिकारी बावळट असल्याचे काकडे यांचे वक्तव्य तर ‘काकडे यांनी शहाणपणा शिकवू नये’, असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिलेले प्रत्युत्तर असा शाब्दीक वाद पुणेकरांनी अनुभवला. नगरसेवकांना नुकतेच मिळालेले निनावी पत्र हे पक्षांतर्गत वर्चस्वाच्या आणि कुरघोडीच्या खेळातील पुढचा डाव समजला जात आहे.
या पत्रातील मजकुर अत्यंत स्फोटक आहे. थेट पालकमंत्री, केंद्रीय मंत्री, शहरातील आमदार, महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप आणि तिखट शब्दांत शेरेबाजी करण्यात आली आहे. खासदार संजय काकडे आणि त्यांच्या समर्थकांना महापालिकेच्या कारभारात डावलले जात असल्याचा आशय या पत्रात असून विरोधी गटाबाबत तीव्र नाराजी आणि धमकीवजा इशाराही देण्यात आला आहे.
पत्रकर्त्याने स्वतःची ओळख लपवून ठेवली असली तरी या निनावी ‘लेटरबॉम्ब’मुळे शहर भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने भाजपातील अंतर्गत लाथाळ्या, गटबाजी आणि भानगडी चव्हाट्यावर आल्या हे पुणेकरांचे भाग्य म्हणावे लागले. पुणेकरांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या भाजपाचा पारदर्शकतेचा बुरखाही टराटरा फाटला आहे. महापालिकेत पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर उणेपुरे एक वर्ष होण्याच्या आतच या पत्रामुळे भविष्यात पक्षातील होणार्या दुफळीची पेरणी झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसेच काकडे समर्थकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनीच त्यातून गोळीबार केल्याचा एक सूरही ऐकू येत आहे. परंतु भाजपातील सध्याचा कारभार पाहता तसे असेल याची शक्यता खूपच धूसर आहे. एकंदरच या पत्रातील सत्यता, त्यामागील मास्टरमाइंड, कोणाचा खांदा, कोणाचा निशाणा आदी अनेक बाबी भविष्यात पुढे येतीलच. तोपर्यंत पत्रामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कारभार्यांना द्यावी लागणार आहेत.
भाजपाने निवडणुका केवळ लोकशाही मार्गानेच जिंकल्या नाही तर मनी-मसल, माइंंडगेम, फोडाफोडी याचा मुक्त वापर केल्याचा पुरावाच या पत्रामुळे पुढे आला. पूर्ण विझलेले, कृतघ्न, गावठी बॉम्ब, दोन टक्क्यांवर जगणारे, सर्कीट, दहिहंडी आयोजक आदी ठेवणीतील विशेषणांनी शहरातील आमदारांची कारकीर्द या पत्रात ‘सजविली’ आहे. तसेच निवडणुकीत कोणी-कोणाचे उंबरठे कधी आणि कसे झिजविले हे कळल्यामुळे पुणेकरांची चांगलीच करमणूक झाली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराच्या महापौर कोण? ही गंभीर बाब पत्रातील प्रश्नातून पुढे आली आहे. याचा खुलासा आता महापौरांना करावा लागणार आहे.
अनेकांच्या राजकारणाची वजाबाकी, गुणाकार, भागाकार करून राजकीय हिशेब चुकता करण्याचाही प्रयत्न या पत्रात केला आहे. परंतु ‘ताडीसम्राट’, ‘मॅटर राजा’ या ‘पुरस्कारां’मुळे पक्षातील ‘संस्कृती’चेही दर्शन घडले आहे. ‘नगरसेवकांवर दबाव आणून टीडीआर, नालासफाईची शंभर कोटींची कामे, वाय-फाय योजना, प्रकाश योजना आदी कामांतून प्रचंड माया कमावली’ असा आरोप या पत्रामध्ये आहे. त्याचे स्पष्टीकरणही ‘नेत्यां’ना द्यावे लागणार आहे. तसेच ‘कलेक्टर’ म्हणजे जिल्हाधिकारी हा अर्थ सर्वसामान्यांना माहित आहे. परंतु पत्रातील ‘कलेक्टर’ म्हणजे काय याचाही खुलासा पुणेकरांना द्यावा लागणार आहे.
भविष्यात काकडे सांगतील तीच पूर्व दिशा अन्यथा आम्ही 55 नगरसेवक स्वतंत्ररित्या निर्णय घेऊ आणि काकडे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची वाट लावू शकतो तर ठरवल्यास भाजपचीसुद्धा काय हालत करु शकतो याची कल्पना तुम्हाला नाही’, हा पत्रातील इशारा भविष्यातील भाजपातील रणकंदनाची नांदी म्हणावी लागेल.
ता. क.- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांचा वापर केला. पत्रातील वाघनखं कोणाचा कोथळा काढतात, याबाबत आता पुणेकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
------------
अधिक बातम्यांसाठी Login करा www.namskarpune.com
भाजपाच्या ‘पारदर्शक’ कारभाराच्या ठिकर्या!
Reviewed by Unknown
on
7:08 AM
Rating:

No comments: